पारधी समाजाच्या महिलेवर २ पोलिसांनीच केला अत्याचार;
प्रशासन आणि सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका सामान्य जनतेला – अॅड.प्रकाश आंबेडकर
भूम, निर्भीड वर्तमान:- काल भूम जि. उस्मानाबाद येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे. एका पारधी समाजाच्या महिलेवर २ पोलिसांनी अत्याचार केला आहे . त्यातील १ आरोपी होमगार्ड, तर दुसरा पोलीस शिपाई आहे.अशी माहिती खुद्द वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा मा. प्रकाश आंबेडकर यांनी पोस्ट करून कळवली आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पीडित महिलेची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे.
पीडित महिला ऊसतोड मजूर असून ती तिच्या मुलांना भेटायला बार्शी येथे जात असतांना बस स्टँडवर आरोपींनी पीडित महिला आणि तिचा दिर यांना थांबवले व त्यांना ‘चोर’ असल्याच्या संशयावरून गाडीत बसवून नेले आणि पैशांची मागणी केली. पीडित महिलेने ऊसतोड मुकादमाकडून उसने पैसे घेऊन आरोपी पोलिसांच्या मोबाईलवर पैसे दिले. यानंतर पुन्हा आरोपी पोलिसाने महिलेला दमदाटी करून त्या महिलेवर अत्याचार केला आणि पीडितेला धमकावले आहे.
या घटनेवरून राज्याच्या कायद्या आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आलाय. एकीकडे खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, तर दुसरीकडे कायद्याचे रक्षकच भक्षक होतात. या सर्व प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पीडित महिलेची भेट घेऊन त्यांना धीर दिला असून ‘वंचित’चे नेते अरुण जाधव यांनी हे प्रकरण लावून धरले आहे.
प्रशासन आणि सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका सामान्य जनतेला बसतोय. गृहमंत्र्यांचे हे सपशेल अपयश आहे. आरोपींना कठोर शिक्षा केली जावी. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर होत चाललाय, हे स्पष्ट होतंय. असे पोस्ट करून मा. प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.